- म. ग., दादर, मुंबई
उत्तर
कोणत्याही विकासकाशी चर्चा करण्याआधी सर्व रहिवाशांमध्ये एकीची भावना असणे गरजेचे असते. पुनर्विकासाबाबत, विकासकाकडे काय मागणी करायची, करारात कोणते मुद्दे असावेत, याबाबत एकमत असणेही महत्वाचे. आपण आपल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपण जो विकासक नेमला आहे, तो जणू मालकच असल्याप्रमाणे वागत आहे असे दिसते. वास्तविक पाहता तो कोण? जमीन महापालिकेची, राहता तुम्ही... पण निर्णय विकासक घेतो हे दुर्दैवच! वास्तविक किती जागा मिळावी, कॉर्पस फंड किती मिळावा हा निर्णय रहिवाशांनी परस्परांत साधकबाधक चर्चा करून कायद्याच्या चौकटीत घ्यायला हवा. त्यानुसार विकासकाकडे मागणी करायला हवी. इथे गंगा उलटी वाहताना दिसते. या पार्श्वभूमीवर जे विकासकाची बाजू घेऊन अन्य भाडेकरूंच्या मतांना किंमत देत नाहीत आणि पुनर्विकास नियमाप्रमाणे करत नाहीत, त्यांच्याशी बोलणी करून त्यांना समजावणे महत्त्वाचे आहे. त्यांना हे समजवायला हवे, की असे केले नाही, तर त्यात त्यांचेच नुकसान आहे. खरे तर जे चालले आहे, त्यात आपलेही नुकसान आहे हे त्यांच्याही लक्षात आले असेलच. खरे तर हे शाळकरी मुलांच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तेव्हा आपल्याला जुमानत नाही अशा विकासकाला पुनर्विकास करायला द्यावा की नाही, याचा पुनर्विचार सर्वांनी मिळून करायला हवा. तुमच्याकडून इतके सहकार्य, पूर्ततेच्या सुविधा मिळूनही तसेच एफएसआय वाढूनही तो आपणास अधिक जागा देत नाही व रहिवासीही तसे मागण्याऐवजी फक्त कॉर्पस वाढवून मागतात हे आश्चर्यकारक आहे.
रहिवाशांच्या या अशा वृत्ती व सवयींमुळेच मुंबईत विकासक रहिवाशांना फसवू शकतात. सगळे निर्णय त्याने घ्यावे व रहिवाशांनी ‘मम’ म्हणावे ही पद्धत चुकीची आहे. आपल्याला नियम माहीत नसतात व विकासक पैसेवाला असल्याने जे सांगेल ते मान्य होते. त्यातून विकासक काहीजणांना विकत घेतो. आपण दिलेल्या माहितीवरून गणित मांडले, तर आपल्याला निश्चित अधिक एफएसआय मिळायला हवा. तसा वाढीव एफएसआय देऊनही विकासकाला फायदाच होणार आहे या व्यवहारात. इतका नफा मिळूनही विकासक सहभागी करून घेत नाही व रहिवासी मूग गिळून बसतात हे चूक आहे. तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. एक तर सर्वसाधारण सभेत विकासक बदलण्याचा निर्णय घ्यायला हवा. दुसरे, किती बांधकाम हवे व कॉर्पस निधी याबाबत निश्चित धोरण ठरवावे व विकासकास अंमलबजावणीस भाग पाडावे. तो तयार न झाल्यास, तुला काढून टाकू असा स्पष्ट पवित्रा घ्यावा. आपले हे म्हणणे न ऐकणारा विकासक घरेही चांगल्या प्रतीची देणार नाही हे लक्षात ठेवा. नीट विचार करून मगच पावले उचला.
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न
‘पुनर्विकास’ सदरासाठी प्रश्न पाठवताना पुढील तपशील देणे अत्यावश्यक आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागू आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत की अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा. प्रश्न शक्य तो टाइप केलेले, किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावेत. पाकिटावर ‘पुनर्विकास सदरासाठी’ असा स्पष्ट उल्लेख न चुकता करावा. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट