Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 943

पुनर्विकासातील फायदेतोटे नीट समजूनच निर्णय घ्यावा

$
0
0

चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमची १०० सदनिकांची, पाच विभाग ('विंग्ज') असलेली सहकारी गृहनिर्माण संस्था ४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभी आहे. 'सोसायटी'ला मालमत्तेचे अभिहस्तांतर ('कन्व्हेयन्स') झालेले असून इमारत ३३ वर्षांची जुनी आहे. इमारत जुनी झालेली असल्यामुळे दुरुस्तीचा खर्च आता परवडणारा नाही, म्हणून पुनर्विकास करण्याचे सर्व सदस्यांनी ठरविले. नियमाप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली व तीतून पाच विकासक निवडण्यात आले. 'सोसायटी'च्या सभासदांमधील अंतर्गत मतभेद व व्यवस्थापकीय समितीची मुदत संपल्यामुळे पुनर्विकास रखडला. आता जरी सदस्यांनी पुनर्विकासाला चालना दिली असली विकासकांनी आधी दिलेले वाढीव चटईक्षेत्राचे आश्वासन निम्मे केले आहे. पूर्वी दिलेल्या ४० ते ४५ टक्के वाढीव चटईक्षेत्राच्या आश्वासनात बदल करून ते त्यांनी २० ते २५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. वाढलेले 'टीडीआर'चे (ट्रान्स्फर ऑफ डेव्हलपमेन्टल राइट्स) दर, बांधकामाचा वाढता खर्च, वाढलेले 'रेडी रेकनर दर', न विकले जाणारे फ्लॅट्स अशी कारणे बिल्डर देत आहेत. 'सोसायटी'च्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी रस्ते असून रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या जमिनीची नोंद विकासकांनी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी घेतली आहे. विकासकांनी वाढीव चटईक्षेत्रात केलेली कपात रास्त आहे का? आम्हाला आताच्या परिस्थितीत किती वाढीव चटईक्षेत्र मिळू शकेल? 'सोसायटी'च्या भूखंडाचा आकार चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक असल्यामुळे 'म्हाडा' किंवा अल्प उत्पन्न गटासाठी जागा सोडावी लागेल का? विकासकांनी दिलेला २० ते २५ टक्के वाढीव चटईक्षेत्राचा सुधारित प्रस्ताव स्वीकारून पुनर्विकास करावा का? — राणे, मुंबई.

उत्तरः आपण पाच विकासकांना निवडण्यासंबंधीचा इतिहास नीट मांडलात, पण त्या पाचपैकी एक विकासक निवडला की कसे, याविषयी माहिती दिलेली नाही. असा विकासक निवडून त्याच्याशी करार झाला का? याविषयीही माहिती नाही. तुम्ही जर एक विकासक निवडला नसेल किंवा कोणत्याही विकासकाशी करार केला नसेल तर नवीन निविदा मागवणे हाच योग्य मार्ग राहील. नवीन निविदा मागवताना आधी ठरवलेले क्षेत्रफळ देणे बंधनकारक राहील अशी अट त्या निविदेमध्ये टाकावी, जेणेकरून किमान ४० टक्के अधिक क्षेत्रफळ मिळण्याची खात्री होईल व त्यापेक्षा कमी देणाऱ्यांच्या निविदा येणारच नाहीत. हा झाला विकासक नेमलेला नसेल तेव्हाचा मार्ग. आता आपण विकासक नेमलाच असेल व त्याच्याशी करारही केला असेल, मात्र आपल्या पत्रात त्याविषयी उल्लेख केलेला नसेल तर आम्ही आपणास काय उत्तर द्यावे? एका बाजूला पाच विकासकांपर्यंतची आपली वाटचाल कायद्याला धरून असल्याचे वाटते. नंतरच्या भागात मात्र ४० टक्के अधिक चटईक्षेत्र कोणी देऊ केले आणि ते २० टक्क्यांपर्यत खाली कोणी आणले याविषयी आपल्या पत्रात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे करार झाला असेल तर तो कसा झाला, त्यातील तरतुदी काय, या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. एरवी, बँकांकडून कर्ज घेऊन पुनर्विकासाची सुरूवात केल्यास ५० टक्क्यांपर्यंतही अधिक जागा मिळू शकेल. मात्र हा मार्ग घ्यावा किंवा कसे हा निर्णय सर्वसाधारण सभेत घ्यावा लागेल. बिल्डरधार्जिणा पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास यातील फायदेतोटे नीट समजूनच निर्णय घेतला तर तो सर्व सभासदांच्या हिताचा राहील.

( या सदरातील उत्तरे ही प्रश्नकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेली असतात. संबंधितांनी कोणतीही कृति करण्यापूर्वी आपल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.)

पुनर्विकासः प्रश्नकर्त्यांना सूचना 'पुनर्विकास' सदराकरिता प्रश्न पाठविताना पुढील तपशील देणे अत्यावयक आहेः भूखंडाचे क्षेत्रफळ, रस्त्याला लागून आहे किंवा कसे, रस्ता किती रुंद आहे, रहिवासी किती, प्रत्येकाच्या सदनिकेचे चटईक्षेत्र किती, दुकाने वा गाळे किती, अधिकृत किंवा अनधिकृत याबाबत स्पष्टता, मुंबई बेट किंवा उपनगर, जमिनीची मूळ मालकी कोणाची, भाडेपट्टा कोणाच्या नावे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे किंवा कसे, हे स्पष्ट असावे. तरच अचूक मार्गदर्शन मिळू शकेल. अन्य अनावश्यक तपशील मात्र कटाक्षाने वगळावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 943

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>