आर्थिक उद्दिष्टांसाठी आत्मसंतुष्टता मारक आर्थिक नियोजन करताना भविष्याचा विचार करणे आवश्यक असते. पुढील ३० वर्षांत जगात काय बदल होतील, निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी किती निधीची गरज असेल, अतिरिक्त घर (सेकंड होम) खरेदी करायचे असल्यास त्यासाठी कोणते शहर निवडावे, आदी प्रश्न स्वत:ला सतत विचारणे आवश्यक असते. दीर्घकालीन नियोजन करताना आत्मसंतुष्ट राहून चालत नाही. संभाव्य आपत्ती, अप्रिय घटना याचा विचार केला तरच परिपूर्ण दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे शक्य होते. यामध्ये खालील घटक परिणामकारक ठरतात. आर्थिक उद्दिष्ट निश्चिती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर किती निधीची गरज असेल, हे आर्थिक उद्दिष्टांच्या साह्याने लक्षात येते. उदा. तुम्ही आणखी ३० वर्षांनंतर निवृत्त होणार असाल तर तेव्हा सध्याचे राहणीमान कायम ठेवण्यासाठी पाच कोटी रुपये वा त्याहून कमीजास्त निवृत्ती निधी आवश्यक असेल. याशिवाय, मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्चही विचारात घ्यावा लागेल. आर्थिक उद्दिष्ट नसेल तर करबचत, उच्च परतावा देणारी गुंतवणूक, आपत्कालीन निधी यासाठी खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आपली जीवनशैली व भावी खर्च ध्यानात घेऊन आर्थिक उद्दिष्ट निश्चित करावे. ध्येय, दिशा बाळगा आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता हीच आयुष्याची इतिकर्तव्यता असते. उत्पन्नाच्या साह्याने ही उद्दिष्टे पूर्ण करता येतात. मात्र कोणत्याही निश्चित ध्येयाशिवाय वा संकल्पाशिवाय ही उद्दिष्टे पूर्ण होणे अशक्य असते. तुमची कमाई, खर्च, बचत, गुंतवणूक किती आहे याचे भान उद्दिष्टांमुळेच येते. तुम्हाला किती कर्जाऊ रकमेची गरज आहे वा खर्चांमध्ये किती कपात करायला हवी याची माहिती याच आधारे मिळू शकते. घरखर्चाचे मासिक बजेट हे आर्थिक उद्दिष्टांमध्ये नेहमीच प्रमुख भूमिका बजावते. योग्य दृष्टिकोन, आर्थिक उद्दिष्ट, आर्थिक शिस्त याच्या अभावी आर्थिक नियोजन होऊ शकत नाही. देयकांचा खर्च लहानमोठी मासिक देयके (बिल) वेळच्या वेळी भरणे क्रमप्राप्त असते. सध्याच्या ऑनलाइन काळात बहुतांश देयके ही ऑटो पे होऊ शकतात. त्यामुळे संबंधित देयके मुदतीत भरली जातात व आर्थिक भुर्दंड टळतो. मात्र ऑटो पे सुविधा घेतली तरी आपली नेहमीची देयके, क्रेडिट कार्डचे बिल, ईएमआय वगैरे खर्चांचा आढावा घेणे आवश्यक आहे. या देयकांवर प्रमाणाहून अधिक खर्च तर होत नाही ना, हे पाहणे व त्यानुसार आपल्या व्यवहारांत बदल करणे हादेखील मासिक बजेटमधील महत्त्वाचा भाग आहे. या देयकांतून अनावश्यक खर्चास प्रोत्साहन तर दिले जात नाही ना, याची काळजी घेतल्यास ती एकप्रकारची बचतच ठरते. गुंतवणुकीचा आढावा गुंतवणुकीस सुरुवात केल्यानंतर तुमची जबाबदारी संपत नाही. उलट या गुंतवणुकीचा नियमित आढावा घेणे हे जबाबदारीचे काम आहे. दर तीन महिन्यांनी हा आढावा घेणे अपेक्षित असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून योग्य अवधीत योग्य प्रमाणात परतावा मिळत आहे की नाही, अपेक्षित परतावा मिळत नसल्यास त्या गुंतवणुकीचे स्वरूप बदलणे आदी निर्णय घेणे सोपे जाते. असा आढावा घेतला नाही व तोट्यात जाणाऱ्या गुंतवणुकीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले तर आर्थिक उद्दिष्टप्राप्तिमध्ये मोठी पिछेहाट होऊ शकते. पगारदार गुंतवणूकदारांनी दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीच्या तुलनेत गुंतवणुकीत भर टाकणे आवश्यक असते. यामुळे आर्थिक उद्दिष्ट लवकर पूर्ण होण्यास मदत होते. कौटुंबिक विमाकवच कोणत्याही जबाबदार व्यक्तीने अथवा कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आयुर्विमा व आरोग्यविमा काढणे अत्यावश्यक असते. अप्रिय प्रसंगांदरम्यान विमाधारक वा त्याच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण पडणार नाही, याची काळजी हे विमा घेतात. स्वत:चा व कुटुंबीयांचा विमा काढणे आवश्यक आहे, याची जाणीव असणे मात्र त्यापासून दूर राहणे हे अतिशय घातकच. (स्रोत- इकॉनॉमिक टाइम्स)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट